'आमची मानसिक तयारी नाही'; फेरपरीक्षेपूर्वी १०० हून अधिक नीट उमेदवारांनी सांगितल्या आपल्या चिंता

'नीट' फेरपरीक्षा उंबरठ्यावर

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
17th June, 01:04 pm
'आमची मानसिक तयारी नाही'; फेरपरीक्षेपूर्वी १०० हून अधिक नीट उमेदवारांनी सांगितल्या आपल्या चिंता

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ फेरपरीक्षेपूर्वी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती, नैराश्य आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मूळ परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्यानंतर पुन्हा अभ्यासाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून, वाढत्या मानसिक दडपणामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. नुकतीच डेहराडूनमध्ये एका २३ वर्षीय परीक्षार्थीने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटनाही समोर आली आहे.

अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर परीक्षा देऊन विसावलेल्या विद्यार्थ्यांना अचानक फेरपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. एका विद्यार्थ्याने आपली चिंता व्यक्त करत सांगितले, पहिल्या परीक्षेअगोदर मी आत्मविश्वासाने बाहेर आलो होतो. मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीने धक्का बसला. आता पुन्हा रात्री ३ वाजेपर्यंत जागून अभ्यास करावा लागत आहे. माझी झोप उडाली आहे आणि जेवणाची इच्छाही मरून गेली आहे. फेरपरीक्षेचा पेपर कठीण असेल, अशी भीती पसरवली जात असल्याने मनात सतत भीतीचे सावट आहे. अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाहीये.



सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार, विद्यार्थ्यांमधील सर्वात मोठी समस्या आता भौतिकशास्त्र (Physics) किंवा जीवशास्त्र (Biology) नसून अनिश्चितता ही आहे. सरकारने प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी हवाई दलाची मदत घेणे किंवा टेलिग्रामवर बंदी घालणे यांसारखे निर्णय घेतले असले, तरी विद्यार्थी याकडे संशयाने पाहत आहेत. जर सर्व काही सुरक्षित आहे, तर टेलिग्रामवर बंदी का? असा प्रश्न विचारत विद्यार्थी या उपाययोजनांनाच संभाव्य धोक्याचे लक्षण मानत आहेत. एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास संपला आहे. मूळ परीक्षेत चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आता पुन्हा तेवढे गुण मिळतील का? या चिंतेत आहेत.

हेही वाचा