२१ हाय-एंड मोबाईल जप्त; कळंगूट पोलिसांची धडक कारवाई

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कळंगूट येथील पार्किंग परिसरातून पर्यटकांच्या कारमधून महागडे आयफोन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कळंगूट पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी पश्चिम बंगालमधील दोन सराईत चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २१ हाय-एंड मोबाईल फोन जप्त केले आहेत. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना लक्ष्य करून मौल्यवान वस्तू लांबवणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे किनारपट्टी भागात सक्रिय असलेल्या मोठ्या चोऱ्यांच्या रॅकेटवर पोलिसांनी जरब बसवली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळचे म्हासदी (धुळे, महाराष्ट्र) येथील रहिवासी असलेले धनंजय भाईदास बेडसे (वय २६) हे आपल्या मित्रासह गोव्यात पर्यटनासाठी आले होते. १२ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली कार कळंगूट येथील पार्किंगमध्ये उभी केली होती. कार पार्क केल्यानंतर ते दोघेही काही वेळासाठी तेथील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी गेले. अवघ्या २० ते २५ मिनिटांत जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांना कारचा दरवाजा उघडा असलेला दिसला. संशय आल्याने त्यांनी गाडीत तपासणी केली असता, कारमध्ये ठेवलेले एक लाखाहून अधिक किमतीचे दोन प्रिमियम ॲपल आयफोन गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरांनी गाडीचा दरवाजा कौशल्याने उघडून हे फोन लंपास केले होते. या प्रकरणी धनंजय बेडसे यांनी कळंगूट पोलीस स्थानकात अधिकृत तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तात्काळ स्थापन करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाचा अचूक वापर करत पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सईन मोल्ला (वय २७) आणि बिश्वजीत रॉय (वय २६, दोघेही रा. दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे समोर आली.
पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे केवळ तक्रारदाराचे दोन आयफोनच नव्हे, तर वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरलेले तब्बल २१ महागडे मोबाईल फोन मिळाले. हे सर्व फोन जप्त करून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला आणि दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अधिकृतपणे अटक केली. जप्त करण्यात आलेले उर्वरित १९ मोबाईल फोन या टोळीने गोव्यात नेमके कुठून आणि कोणाचे चोरले होते, याचा सखोल शोध आता पोलिस घेत आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या थेट देखरेखीखाली कळंगूट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.