फूट किंवा विलीनीकरणाचे दावे मान्य करू नका; अरविंद सावंत यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील संभाव्य फूट आणि खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असताना, पक्षाचे लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ठाकरे गटातील कोणत्याही खासदाराने स्वतंत्र गट किंवा अन्य पक्षात विलीनीकरणाचा दावा केल्यास तो स्वीकारू नये, अशी विनंती सावंत यांनी केली आहे.
माध्यमांमध्ये काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याचा किंवा दुसऱ्या राजकीय पक्षाशी हातमिळवणी करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी पक्षाची अधिकृत भूमिका अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीनीकरणासाठी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाशी संपर्क साधत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अशा घडामोडी संविधानातील राजकीय पक्ष आणि विधिमंडळ गटांच्या व्यवस्थेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्यांवर किंवा प्रतिनिधित्वावर विचार करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठाकरे गटातील खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडण्यासाठी मोठ्या रकमेच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असून, संभाव्य पक्षांतर रोखण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचालींना वेग दिल्याचे मानले जात आहे.